
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाला गेल्या आठवड्यातील पावसाचा मोठा फटका बसला आहे. घाटातील रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जुन्या कसारा घाटातील जव्हार फाटा येथे ही संरक्षक भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या भेगा पडल्या असून तिथे मोठे खड्डे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे, रस्त्याच्या खालच्या बाजूचा मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेल्याने रस्त्याचा काही भाग हा हवेत लटकल्यासारखा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पाऊस सुरू असता तर मातीचा हा भराव आणखी खचून मोठी दुर्घटना घडली असती असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने या धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. मात्र केवळ बॅरिकेड्स लावून हे काम थांबणार नसून हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने रस्ता तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून काय ठोस पावले उचलली जात आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडीओ बातमी पहा https://youtube.com/shorts/U_61U_qWy-w?si=L_TVHEk1ZMnRJEoH
