त्र्यंबकच्या हरसूल पाणलोट विभागात खोट्या बिलांद्वारे शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप : अरुण भागडे यांचे उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना निवेदन 

इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल पाणलोट विभागामध्ये कार्यरत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शेतकरी हिताच्या योजनांमध्ये गंभीर स्वरूपाच्या आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अरुण रामदास भागडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे, प्रधान सचिव, यांच्याकडे निवेदनाद्वारे उच्चस्तरीय चौकशीची व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त कागदपत्रांच्या पडताळणीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कोऱ्या बिलांची निर्मिती करणे तसेच झेरॉक्सचे अवास्तव दर दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. पेट्रोलचे खोटे किंवा संशयास्पद बिले जोडणे, शेतकऱ्यांच्या नावावर बनावट सह्या घेणे आणि खोटी कागदपत्रे तयार करून शासणाच्या निधीचा गैरवापर केल्याचे प्राथमिक पुराव्यांवरून निदर्शनास आले आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी व तोंडी विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर देण्याऐवजी माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मागितल्यामुळे तक्रारदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फोन करून मानसिक त्रास देणे, आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि अप्रत्यक्ष धमकल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रामा दिघे, प्रमोद ढोकचौळे, अक्षय मुखेकर आणि गणेश बांबळे यांच्या कामकाजाबाबत सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाचे झालेले आर्थिक नुकसान संबंधित दोषींकडून वसूल करावे आणि त्रयस्थ व निष्पक्ष चौकशी समिती नियुक्त करावी असे निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!